यंदा आषाढीसाठी पंढरीत नाही वारकऱ्यांना प्रवेश; संतांच्या पादुका खास हेलिकॉप्टरने आणण्याच्या हालचाली
schedule07 Jun 20 person by visibility 494 categoryकरमणूक
पंढरपूर: द फायर: प्रतिनिधी: कोरोनाव्हायरसच्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा आषाढी यात्रा काळात भाविकांना पंढरीत प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी प्रशासनाने उपायोजना हाती घेतली आहे. राज्यभरातून यात्राकाळात एकाही वारकऱ्याला पंढरपुरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यंदा आषाढी यात्रेच्या सोहळ्याला येणारे सर्व पालखी सोहळे रद्द करण्यात येणार आहेत. मानाच्या सात संतांच्या पादुका विशेष हेलिकॉप्टरने पंढरीत आणल्या जाणार आहेत. त्यात अगदी मोजक्या वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. कोणाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा अभूतपूर्व निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची निवासाची व्यवस्था असणाऱ्या मठ, धर्मशाळा, हॉटेल्स व इतरही खाजगी ठिकाणांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे. यात्राकाळात कोणालाही राहण्यास परवानगी देऊ नये असे बजावण्यात आले आहे. तसेच या ठिकाणांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. आषाढी सोहळा हा वारकरी संप्रदायात सगळ्यात मानाचा व मोठा सोहळा असतो. दरवर्षी राज्यासह परराज्यातूनही सुमारे 18 ते 20 लाख भाविक येत असतात. यंदा पंढरपुरात प्रवेशासाठी एकाही नागरिकाला परवानगी न देण्याचे पत्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना याआधीच पाठविण्यात आले आहे.